Ad will apear here
Next
शहाजीराजे भोसले
शहाजीराजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी मालोजीराजे व दीपाबाई ऊर्फ उमाबाईसाहेब यांच्या पोटी झाला. मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमतः फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्याबरोबर राहत होते. मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांनी आपली मुलगी दीपाबाई मालोजीराजे यांना दिली होती. नंतर त्यांचे नाव उमाबाई ठेवण्यात आले. त्यांना दोन मुले. एक शहाजी व दुसरे शरीफजी. 

मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागीरदार झाले. शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी होते. त्यांची कीर्ती निजामशाही आणि आदिलशाहीत कदाचित इतर कुळातील सरदारांपेक्षा अधिक प्रस्तुत झालेली होती. शहाजीराजांच्या आई उमाबाई या एक धाडसी, दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या. त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले व वाढले होते. बालपणापासूनच राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले होते. त्यामुळे ते फक्त योद्धा नसून, त्यांचे मन साहित्य संगीत याकडेही आकर्षित झाले होते. 

उत्तरेकडे आणि दख्खनमधे प्रचंड राजकीय उलथापालथी घडल्या. त्यातच शहाजीराजांचे कर्तृत्व इतिहासात उजळून निघालेले दिसते. रणशौर्य हा शहाजीराजांच्या जीवनाचा जन्मजात आणि अविभाज्य गुण आहे. ह्या तरुण मराठा योद्ध्याने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे इ. स. १६२४च्या ऑक्टोाबरमध्ये, अहमदनगरजवळ भातवडीच्या टेकाडबहुल प्रदेशात दोन सुलतानी महासत्तांचा एकाच दिवशी, एकाच वेळी, जंगी पराभव केला. 

दिल्लीच्या जहांगीर बादशहाची फौज एकवटून निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रावर लोटली होती. ती निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांनी, आपल्या त्या मानाने अगदीच कमी असलेल्या फौजेनिशी, अत्यंत कल्पकतेने प्रचंड मोठ्या फौजेचा कमीत कमी वेळात संपूर्ण पराभव केला. मुघल शहेनशाहने इ. स. १६२४मध्ये लष्कर खानला १.२ लाख सैन्यासह निजामशाही संपवण्यासाठी दक्षिणेस पाठविले. त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. 

एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरव्ही दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गाव अहमदनगर पासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. 

शहाजीराजांच्या लष्करी कर्तृत्वाचा प्रदेश! सह्याद्रीचा यात येणारा डोंगराळ भाग, जंगल भाग आणि नद्यांची खोरी; शहाजीराजांनी युद्धाच्या, विशेषत: गनिमी काव्याच्या हुतूतूसाठी, आट्यापाट्यांसाठी आणि लपंडावासाठी वापरली. त्यांचे यौद्धिक सामर्थ, त्यांनी ह्या भौगोलिक अतिबिकट अशा स्थळांमधेच बहुतांशी वापरले. म्हणजेच निसर्गदत्त भौगोलिक अजिंक्य प्रदेशाचा त्यांनी मुघलांसारख्या गडगंज श्रीमंत, पण आक्रमक गलेलठ्ठांशी लढण्यासाठी उपयोग केला. ह्या गलेलठ्ठांच्या स्थूल तोफखान्याला, हत्तींच्या झुंडींना आणि जनानखाने सांभाळीत केवळ दिवसाउजेडी जमेल तेवढ्या लढाया करणाऱ्या, श्रीमंत मुघलांच्या दाट गर्दीला पाच वर्षे कोल्ह्याच्या कौशल्याने आणि चित्त्याच्या चपळाईने शहाजीराजांनी खेळवले. 

शौर्याने आणि पराक्रमाने दोन बादशाही सत्तांचा पराभव सह्यप्रदेशातील एक तरुण आपल्या थोडक्या फौजेनिशी, थोडक्या वेळात, एकाच वेळी करतो हा इ. स. ११०० ते १६०० ह्या पाचशे वर्षांतील भरतखंडातला एक विलक्षण चमत्कार होता. गनिमी काव्याचे युद्धतंत्र अत्यंत कल्पकतेने वापरून शहाजीराजेंनी चमत्कार घडवून आणला. बारकाईने अभ्यास केला तर आपल्या हेच लक्षात येईल, की, राजकारणातले आणि रणांगणावरचे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राचार्य होते शहाजीराजे.
 
ह्या सर्व राष्ट्र उभारणीचा पाया कोणी घातला, राष्ट्रीय चारित्र कोणी घडविले त्याचा प्रारंभ महाराज साहेब शहाजीराजे यांनी केला. भोसले घराण्याची प्रतिष्ठा, नावलौकिक, शौर्याची परंपरा यांचा वारसा शहाजीराजांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना प्राप्त झाला. वयाच्या बाराव्या वर्षी सन १६४१ झाली छत्रपती शिवाजीराजे आपल्या मातोश्रींसह बंगळुरास पित्याच्या भेटीस गेले, तेथे एक-दोन वर्षे राहिले. हा कालखंड अल्पसा असला तरी शिवाजीराजांच्या संस्कारक्षम वयातील त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारा महत्त्वाचा घटक ठरला. बंगलोरहून छत्रपती शिवाजीराजे आपल्या मातोश्रींसह महाराष्ट्रात परतले ते असे संस्कार घेऊनच. हे संस्कार होते पराक्रमाचे, मुत्सद्देगिरीचे आणि इतिहासातून काही शिकण्याचे! शहाजीराजांचे स्थान आदराचे आहे, तर राजमाता जिजाऊंचे स्थान आदरयुक्त श्रद्धेचे आहे. 

मराठी मातीत स्वराज्य निर्मितीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनीच घातला. आपले स्वप्न आपल्या मुलाच्या हातून साकार करून घेणारा हा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता. स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती जिजाऊ-शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे. 

भातवडीच्या युद्धामुळे शहाजीराजांची प्रतिष्ठा खूप वाढली. त्यांना वगळून आता दक्षिणेत कोणतेही राजकारण अशक्य होते. भातवडीच्या लढाईचे खरे शिल्पकार शहाजीराजेच. पुढे इ. स. १६६१-इ. स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी, इ. स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी, कर्नाटक) येथे बांधली. 

शूर व पराक्रमी शहाजीराजे भोसले यांना जन्मदिनानिमित्त मानाचा मुजरा!

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GUDVCW
Similar Posts
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
लोककल्याणकारी राजे सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे लोककल्याणकारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा सहा फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
मल्हारराव होळकर कटकेपासून अटकेपर्यंत मराठेशाहीचा दरारा निर्माण करणारे, १७व्या शतकात मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महान सरदार सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language